कुणी समजून घेत नाही
याची खंत कधीच नव्हती
मीच कुणाशी बोलत नाही
हा आरोप लोकच करतात.
रानफुलातला, प्राजक्तातला फरक त्यांना कळतो,
पाखराताला, फुलपाखरातला फरक त्यांना कळतो,
मग हे का नाही कळत त्यांना की
प्रत्येक माणसाच्या साच्यातही फरक असतो.
हळवे डोळे नेहमी रडवेच नसतात
स्वप्न घेऊन ते ही जगतच असतात,
बंद ओठांची माणसं मूक नसतात खरी
त्यांच्याही मनात वावटळं असतात.
मी तोंड उघडत नाही
दाताखाली जीभ येऊ नये म्हणून,
डोळे वर करून पाहत नाही
प्रकाशाने दिपून जाऊ नये म्हणून.
हसत नाही, कुणी रडू नये म्हणून
रडत नाही, कुणी हसू नये म्हणून
सोबत करत नाही, जाता येत नाही म्हणून
थांबून राहत नाही, थांबता येत नाही म्हणून.
मी तुमच्यातला आहे हे धरून चालू नका,
वाळीत टाका पण टोचून मारू नका.
हळवेपण आटणार नाही, एकटेपण घटणार नाही,
मारून मुटकून मला पठडीतला माणूस बनवू नका.



