मी तोडल्या साखळ्या हातीयांनी स्वतःच्या
पण काही घाव घणाचे हातावरही पडले
अन ओरखडे साखळकड्यांचे अंगभर
त्यात काही रेशीमपाशही तुटले
मुळात नकोच होता पाश कुठलाही
पण साधले काय आज ह्या मुक्तिने ?
स्वछंदता की एकाकीपण
की उध्वस्त भावविश्व पाशवी अहंकाराने?
वाहते केले अश्रू दबून ज्वाला होण्याआधी
झिडकारली घुसमट मोकळ्या श्वासासाठी
ना मोद ना खेद जीवनात कुणाचा
असहाय्य तडफड जगण्यासाठी
मी होवून भयभीत अगतिक नमून घ्यावे
की झुंज देत सोशीत उभे रहावे
परि कळेना कोण येथे लढतो कोणाशी
घाव कुणाचे, पडती कोणावर, जखमा उराशी.
तेच जीवन जे जगतो अश्वत्थामा
मागतो वरदान, मरणाचे
विश्राम शरशय्येवर भीष्माचा
चिंतन रणांगणाचे.



